राज्यपाल महोदयांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, जाहीर माफी मागितली पाहिजे

 

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात सध्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि विकासात वाढ नाही तर वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल महोदयांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, त्याचसोबत ह्या मातीत जन्मलेल्या अनेक थोर व्यक्तींच्या योगदान आणि बलिदानाचा देखील अनादर आहे. या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच… महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिकेसाठी त्यांनी जाहीर माफी मागावी, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

तर दुसरीकडे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी भगतसिंग कोश्यारींची बाजू घेतली आहे. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. तसेच “…तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?” असा सवाल देखील विचारला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “एवढेच कशाला… तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही??” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: