बीडीडी चाळींना आता राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं नाव

 

मुंबई | मुंबईतल्या बीडीडी चाळींची ओळख मागच्या शंभर वर्षांपासूनची आहे. या ठिकाणी अनेक चळवळी उभ्या झाल्याची नोंद आहेत. या ठिकाणी अनेक मुंबईकरांनी, कष्टकऱ्यांनी घाम गाळला आहे. ही वास्तू म्हणजे कष्टकरी आणि सामान्य नागरिकांची वस्ती म्हणून ओळखली जाते. याच बीडीडी चाळीचं नामकरण केलं जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली आहे.

वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना.म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर अशी नावं देण्यात आली आहेत अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत गुरूवारी केली. गोरेगावमधल्या पत्रा चाळीचं नामकरण आता सिद्धार्थ नगर असं केलं गेलं आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं.

‘अनेक वर्ष बंद असलेली बीडीडी चाळ. या चाळीच्या कामाला सुरूवात होईल की नाही अशी शंका वाटत असतानाच त्या चाळकऱ्यांशी त्या चाळीत जाऊन मी आणि आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. आता योजना पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. कौतुकास्पद बाब ही आहे की २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना आता सुरू झाली आहे. पुढच्या पाच ते सहा वर्षात ती पूर्ण झाली असेल. याचा मला निश्चितच आनंद आहे.

तसेच एक महत्त्वाची घोषणा मी करतो आहे, बीडीडी चाळ हे नाव होतं. या चाळींना शंभर वर्षे लोक बीडीडी म्हणून ओळखत होते. पण या नगरांचं नामकरण आपण केलं आहे. सर्व रहिवशांना पाचशे चौरस फुटांचं घर मिळणार आहे. बीडीडी वरळीला बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव बीडीडीला शरद पवार नगर आणि ना.म. जोशी बीडीडीला राजीव गांधी नगर असं नाव देण्यात आलं आहे.’

Team Global News Marathi: