मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आता स्थानिक लोकप्रतिनिधी, चाळ समन्वय समिती आणि रहिवाशांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहे. त्यामुळे लवकरच बीडीडी चाळीचा कायापालट होणार आहे. मागच्या काही महिन्यात राज्य सरकारने बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पासाठी अनुकूल आणि रहिवाशांना विचारात घेऊन काही निर्णय घेतले आहे. तुमुलर रहिवाशांच्या संमतीने म्हाडाने प्रकल्प पूर करण्याचे निश्चित केले आहे. प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, चाळ समन्वय समितीचे सदस्य आणि रहिवाशांसोबत बैठका सुरू केल्या आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी योगेश म्हसे यांनी मंगळवारी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाची पुढील दिशा ठरवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी पुनर्विकास प्रकल्प टप्प्याटप्प्याने केला जाणार असून त्यामध्ये कोणत्या चाळी प्राधान्याने घेतल्या जाणार आहेत, बाधित रहिवाशांना संक्रमण शिबिरांची व्यवस्था करणे, त्यांच्याशी कायदेशीर नोंदणीकृत करारनामा करणे, भाडय़ाची व्यवस्था करणे, अधिकृत धार्मिक स्थळांचे पुनर्वसन याबाबतचा नियोजित आराखडा मुख्याधिकाऱयांनी लोकप्रतिनिधींसमोर मांडला.
तसेच पोलीस कर्मचाऱयांच्या इमारतीही या पुनर्विकास क्षेत्रात येत असल्याने त्यांचीही संक्रमण शिबिराबाबत गैरसोय होणार नाही असे निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिले. या बैठकीला शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, नायगाव बीडीडी चाळ समन्वय समितीचे सदस्य दत्ता दिवेकर, राजेंद्र धुमाळे, प्रशांत घाडीगांवकर, नितीन कदम, योगेश कांबळे, सुनील गायकवाड, विजयकांत वंजारे तुषार शिंदे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि एल अॅण्ड टीचे नितेश महाजन, प्रकाश खेकरे, सागर रांगणेकर हेही उपस्थित होते.