युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर आशिष शेलारांचं लक्ष्य

 

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलं आहे. माजी पर्यटन आणि पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे.

विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागत आहे. त्यामुळे दहीहंडीवरुन वरळीत राजकीय काला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. येत्या शुक्रवारी वरळीच्या जांबोरी मैदाना हा दहीहंडी सोहळा होणार आहे.

वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवक असतानाही दहीहंडी सोहळ्याच्या आयोजनात भाजपने बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दहीहंडी उत्सवासाठी शिवसेनेकडून पर्यायी मैदान शोधलं जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली. त्या दृष्टीने आशिष शेलार तयारी लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून की काय त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे वळवला आहे.

Team Global News Marathi: