एक वर्ष शेतात राब राब राबलो..अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो

एक वर्ष शेतात राब राब राबलो..अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो

डॉ.तानाजीराव सावंतांनी मन मोकळे करताना मांडला संघर्षमय जीवनाचा पट

मुंबई ” गरीबीमुळे तब्बल एक वर्ष शेतात पडेल ते काम केले.राब राब राबलो.त्यानंतरच्या काळात कराडला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला! संघर्ष माझ्या रक्तात आहे.त्यामुळेच सात आठ सहकाऱ्यांना घेऊन निष्ठेने सुरू केलेला शिक्षण क्षेत्रातला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला. गुणवत्ता आणि गरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न मला लगेच समजतात ते कोणी समजावून सांगण्याची गरजच नाही!”, अशा भावना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे (जे.एस.पी.एम.) प्रमुख आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केल्या.

 

आपल्या आक्रमक राजकीय शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे डॉ.तानाजीराव सावंत यांचे संवेदनशील आणि सामाजिक जाणीवेचे वेगळेच रुप मंत्रालयात त्यांच्या दालनात राज्यातील संपादकांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये अनुभवायला मिळाले.

शिक्षण क्षेत्रात ” विद्यार्थी पालक” सारख्या अनेक प्रयोगांचे दाखले देताना गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी व त्यांच्या निष्ठावान टीमने केलेल्या परिश्रमाची माहिती त्यांनी दिली.राजकीय वाटचालीतील अनेक रंजक घडामोडींचे किस्से सांगतानाच स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकपदाची नोकरी चक्क रेल्वे स्टेशनवर कशी दिली,यांची आठवणही सांगायला ते विसरले नाहीत.

या गप्पा सुरु असतानाच महाराष्ट्राला कोरोना संकटातून बाहेर काढण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणारे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दालनात दाखल झाले.हीच संधी घेऊन संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांचे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक राजेश टोपे यांच्या हस्ते आरोग्यमंत्री डॉ.साव़ंत यांना भेट दिले.

या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा साम टीव्हीचे संपादक पत्रकार राजेंद्र हुंजे, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे संपादक अभिजीत कांबळे हेही उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: