मुंबई | भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते आता राऊत यांनी केलेल्या विधानाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खास कोल्हापूर शैलीत समाचार घेतला आहे.
आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ते आज दिल्लीहून आल्यानंतर मुंबईत पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा टोला लगावला होता.
हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.