मुंबई | राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असताना दुसरीकडे विरोधकांनी लोकल ट्रेन आणि मंदिराची दारे उघडण्याकरता आंदोलनाची हाक दिली आहे. आता या विरोधकांच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला हणाला आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाहीये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.
दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट लावण्याची गरज काय आहे?. जेव्हाचं तेव्हा बघू असा विचार केला असता तुम्ही. पुढची लाट येईल तेव्हा बघू. पुन्हा एकदा सरकारच्या डोक्यावर बसू असा विचार केला असता तुम्ही. पण प्रताप, तुम्ही तसा विचार केला नाही. तुम्ही ऑक्सिजन प्लांट सुरू केला. पण राज्यात काही जणांचं राजकारण सुरू आहे. लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत असा टोला मुख्यमंत्रीयांनी विरोधकांना लगावला होता.