राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून कधीकाळी सत्तेत आणि आता विरोधी बाकावर बसलेले राष्ट्र्वादीने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार करा अशी विनंती आम्ही अनेक दिवसांपासून करत आहे.
आता यावर मुख्यमंत्र्यांनी फक्त लवकर करु लवकर करु असं म्हणणं बंद करावं, असा सल्ला पवारांनी दिला. मुख्यमंत्र्यांना माईक बंद करायचं कळत नाही? असा सवालही त्यांनी केला. पुढे अजित पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे सोबत असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे. मात्र, आता वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
पुढे मंत्रिमंडळ विस्तारावरुन टोला लगावताना ते म्हणाले, की सचिवांना अधिकार द्यायचे तर चीफ सेक्रेटरींनाच अधिकार देऊन टाका ना. लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार दिलेले नाहीत. मंत्रिपदं दिली नाहीत. दिल्लीवारी केल्याशिवाय आणि तिथून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येत नाही हे स्पष्ट आहे.मध्ये कानावर आलं की राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार. आता ऐकायला मिळतंय की कोर्टाच्या निर्णयासाठी थांबले आहेत असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले.