विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला होता. शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. ११ जुलैपर्यंत कुठल्याही आमदारावर कारवाई होऊ शकत नाही असं सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेणारं पत्र ५१ आमदारांच्या सहीने राज्यपालांना पाठवण्याच्या तयारी आहे. त्यामुळे जर राज्यपालांनी हे पत्र स्वीकारलं तर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल सांगू शकतात. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागू शकतं.
दीपक केसरकर म्हणाले की, यशवंत चव्हाण यांना पंतप्रधान बनण्यासाठी राष्ट्रपतींनी आमंत्रण दिले होते. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी नकार दिला. जर ५१ आमदार गुवाहाटीला निघून आले असतील त्याचा अर्थ हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सन्मानपूर्वक राजीनामा दिला पाहिजे अशी थेट मागणी त्यांनी केली आहे आता यावर शिवसेना पक्षातून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.