काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनीनिमित्त बोलताना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे काँग्रेसबाबत असं बोलल्याचं स्पष्ट झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असं म्हणत त्यांनी दंड थोपटले आहे. आता पाटोळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आणि आघाडीतील घटक पक्षाला आव्हान देऊन पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाड होण्याचे संकेत दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, “स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजपवाले पण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही. आम्ही कोरोना काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. ते पक्षप्रमुख म्हणून बोलले. त्यामुळे ते असं वाक्य बोलले असतील. जर हे काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेण्यात गैर काय आहे.”