डोंबिवली | सध्या राजकीय वातावरण तापले असून त्यातच शिवसेनेत नाराजी पसरलेली दिसून येत असून शिवसेनेत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत शिवसेनेच्या एका आदेशामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीलगतच्या 27 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनं प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करत डोंबिवली ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश दिले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी हे आदेश काढले आहेत.
या आदेशानंतर शिवसेनेत बरीच नाराजी दिसून आलीये. यानंतर डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया दरम्यान प्रशासकीय कामासाठी हा भाग डोंबिवली शहर शाखेशी जोडण्याचा निर्णय ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी बोलूनच घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एवढंच काय तर संघटना चालवण्यासाठी आपण समर्थ असल्याचं म्हणत नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या जखमेवर लांडगे यांनी मीठ चोळलं आहे. गोपाळ लांडगे यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामीणमधील तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिला.
राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की, या विभागाचा समावेश शहर शाखेत करून आमची गरज भासत नसेल तर यापुढे जाऊन राजीनामे मागण्याआधीच आम्ही राजीनामे देत आहोत.दरम्यान ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर ही वरिष्ठांकडून त्यांची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. यामुळे शिवसेनेला या ग्रामीण भागात फटका बसू शकतो.