मुंबई | हनुमान चालीसा आणि त्यानंतर भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर झालेल्या दगडफेकीचे समर्थन केले आहे. तसेच, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबाने दिलेल्या पुरस्कारावर टीका केलीये. त्यावर आता भाजपचे उत्तर आले आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे राऊत आणि आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात की, “रोज सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपाच्या नावाने शिमगा करायचा, हा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून, त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत असतो अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच किरीट सोमय्या यांच्यावरील दगडफेकीचे समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले, अशी टीका उपाध्येंनी राऊतांवर केली आहे. आता या टीकेमुळे येणाऱ्या काळात शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा वाढ उफाळून येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.