लग्नाची पहिली रात्र…वाचा अस काय घडलं की…

दोन दिवसाचे लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा . सर्व दमले होते . पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती . मनोहर फार आनंदात होता . रात्री तो आपल्या खोलीत गेला . त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटांच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसलेली दिसेल . पण माधुरी तर खुर्चीवरच बसली होती .

 

‘ मला काही महत्वाचं बोलायचं आहे . ‘ माधुरी म्हणाली .‘ आजच ?आत्ताच ? ‘ ‘ होय ! आजच आणि आत्ताच . ‘
‘बरं बोल . काय सांगायचं आहे ?’ ‘मी लग्नाला तयार नव्हते . ‘

मनोहर एकदम दचकला , ‘ काय म्हणतेस तू ? वेड लागलाय का तुला ? अगं परवाच आपलं लग्न झालं न ?आणि आज तू हे काय म्हणतेस ? कोणी काही बोललं का तुला ? ’

‘ नाही . ‘‘ मग ? ‘‘ मग काय , जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतेय . हे लग्न मला मान्यच नव्हतं . ‘‘ अगं , मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं ? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणे …… ‘‘ माझा नाईलाज होता . ‘‘ म्हणजे ? ‘

‘ तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले . काका-काकूंनी सांभाळले मला . काका तसे प्रेमळ होते , पण काकूंनी मला खूप छळले . स्वत:च्या मुलांबरोबर चांगली वागायची पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची . घरातली सर्व कामं माझ्याकडून करवून घ्यायची . माझ्या प्रत्येक गरजांसाठी , आवडी-निवडी साठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे . माझ्यामुळे काका-काकूंमधे सारखे वाद व्हायचे . काका-काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्याही उत्पन्नाची काहीच सोय नव्हती .

शेवटी काका-काकूंनी जमेल तसे माझे लग्न उरकून स्वत:ची मोकळीक करून घेतली . मलाही नाही म्हणायला सोय नव्हती म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले . शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता . ‘ माधुरी सांगत होती , ‘ हालच सोसायाचे असतील तर कुठेही असो , काका-काकूंकडे कशाला ? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही . ‘

‘ पण आता तर लग्न झालं ना ? ‘ मनोहरला काही उलगडा होत नव्हता .‘ होय ! पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं .‘ माधुरी म्हणाली .‘ मग कोणाशी लग्न करायचं होतं ? ‘ मनोहर आता वैतागला . त्याचा आवाज थोडा वाढला होता.

‘ जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही . शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील . ‘ माधुरी शांतपणे म्हणाली . मनोहरला माधुरीच्या व्यवहारचे फार आश्चर्य वाटत होते.

‘ अगं , पण मी माझ्या आईवडिलांचा एककुलता एक मुलगा . माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तू ही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस . शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील ? ‘ शांतपणे तो म्हणाला .

‘ तो तुमचा प्रॉब्लेम आहे . ‘ तितक्याच शांतपणे माधुरी म्हणाली.

 

मनोहरचा पारा परत एकदा वाढला . पण त्याने स्वत:ला आवरले . पहिल्याच रात्री तमाशा नको . पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दु:खावला . काय करावे हेच त्याला समजेना . काय बोलावे हे देखील कळेना . तीन दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झाले , आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्नच मुळात तिला मान्य नाही आणि याहीपेक्षा हे की तो तिची आवडच नाही . हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला . ‘हे बघ आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगवेगळे नाही . बरं , मला सांग मी तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा? ‘ मनोहर ने तिला समजविण्याचा प्रयत्न केला .

‘ याचा एकच अर्थ . माझी आवड तुम्ही नाही . ‘ माधुरी शांतपणे म्हणाली .‘ पण माझ्यात काय दोष आहे ? ‘‘ तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला रस नाही . ‘ माधुरी हळूच म्हणाली .‘ खरं काय ते सांग …. प्रस्तावना बरीच झाली . ‘ मनोहरला आता सहन होत नव्हते .

‘ सांगते, ऐका . ‘ माधुरी बोलू लागली , ‘ माझं एकावर अतोनात प्रेम आहे . माझ्यासाठी तो ईश्वरच आहे . माझा देव आहे . हवं तर दैवत समजा . मी त्याला कधीही विसरू शकत नाही . मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे . दिवस रात्र त्याचाच विचार करते . माझं प्रेम अगदी पवित्र आहे . जसं राधेचं प्रेम . जसं मीरेचं प्रेम . पण प्रेम झालं असलं तरी आम्हीं दोघं लग्न करू शकत नाही . काका-काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरविलं , की आमचं प्रेम जगात अमर करायचं . नावापुरता आपापला संसार रेटावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं . संसारच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही .’

‘ पण ही तर फसवणूक झाली ना ?’‘ कोणाची ? ‘‘ तुझ्याकडून माझी . तुझ्या प्रियकराकडून तुझी . आणि तुम्हां दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील . ‘

 

‘ समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये . ‘ माधुरी शांतपणे बोलत होती , ‘ समाजाने मला काय दिलं ? समाजत आणि चारचौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगतं आहे . माझे आईवडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे . काकांच्या मुलांमधे आणि माझ्यामधे कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला ? असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची ? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे

. माझ्या प्रियकराने कोणाचीही फसवणूक केलेली नाही . त्याने सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहे . खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानतं नाही . उरला प्रश्न तुमचा तर माझंच स्वत:च लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते

. ‘ – मनोहरला बघीर झाल्यासारखं झालं . एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणा तिसऱ्याशी असल्याची चक्क कबुली देत होती . नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती . यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का ? काय करावं हे त्याला समजेनासं झालं . आई-वडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती . लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती .

 

आई-वडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रमले होते .आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशीही कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल ? वडिलांचे तर नुकतेच बायपासचे ऑपेरेशन झालेले आहे . त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही . आईदेखील खचून जाईल . चारचौघांना तिला सामोरे जाता येणार नाही . आजपर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे काय होईल ? नवीन नवरी त्याला लगेचच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही-नाही ते बोलतील . या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे ? या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला .

‘ मग आता पुढे काय ? ’ मनोहरने विचारले . त्याच्या आवाजत वेदना होत्या .‘ हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते ? ‘‘ म्हणजे तू जाणार ? ‘‘ होय . ‘‘ पण कुठे ? ‘‘ सध्या तरी माहित नाही . ‘

थोडा वेळ दोघेही शांत बसले . मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता . माधुरीची नजर खालीच होती . ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरीत होती . ती सर्व सांगून मोकळी झाली होती . आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती . काय करावे हाच विचार त्याला सारखा त्रास देता होता .

त्याच्या मते , लग्ना अगोदरचे काही संबंध असले तर बहुदा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात . पुरुषही काही वेगळं वागत नाही . पण इथं तर पहिल्याच रात्री सर्व उघडकीस आलं होतं, आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती . आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासतं होतं . आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पनाही नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीतच वाटत नव्हती . आता मार्ग मनोहरलाच शोधायचा होता .

‘ हे बघ , मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहित असणं शक्य नाही . पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीनं योग्य नाही . लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे . तू वेळीच सावध हो . त्याचा नाद सोड . नाही तर तुझी वाट सर्वात जास्त खडतर असणार आहे . ‘

‘ प्रेमाच्या वाटेवर कितीही संकटं सहन करण्याची माझी तयारी आहे . ‘

आता मनोहर चिडला , ‘ तुला एकटीलाच सहन करावं लागणार आहे . जाऊ दे ….. जास्त चर्चा करण्यात काय अर्थ ? आता असं कर …. दोन-चार दिवस जाऊ दे . माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे . मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वत:च पोहचवून येईन . मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील .

तोपर्यंत कुठंही या बाबतीत वाच्यता करू नको . आणि काळजी तर मुळीच करू नको . एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही . माझं प्रेम चारच दिवसांचं असलं तरी ते प्रगल्भ आहे . त्यात बालिशपणा नाही . तू पलंगावर शांत झोप मी झोपतो सोफ्यावर . ‘

सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली . घड्याळात आठ वाजले होते . खोलीत माधुरी नव्हती . त्याला एकदम धस्स झालं . माधुरी कुणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला . घाईघाईने तो बाहेर आला . आणि पाहतो तर काय , माधुरीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते .

अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते . बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते . माधुरी बाबांसाठी पुजेची तयारी करत त्यांच्या जवळ बसली होती . एक-एक फुल वेचून माळा गुंफत होती . हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं . माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळचं तेज होतं . रात्रीच्या माधुरी पेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती . मनोहरचा स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसतं नव्हता . बऱ्याच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता . बाबांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं .

‘ सुनबाई , तुमचे यजमान उठले . त्यांच्यासाठी चहापाण्याच बघा . ‘ बाबा हसत म्हणाले .मनोहर परत आपल्या खोलीत परतला . त्याला काही समजेचना . थोड्यावेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली . चहा टेबलावर ठेऊन ती परत जाऊ लागली .

‘ थांब .’ मनोहर म्हणाला .‘ बाबांची पूजा आटोपली की येते . ‘ म्हणत ती निघून गेली .

मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तो पर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती . मनोहरला तिला बरच काही विचारायचं होतं . रात्रीची माधुरी व आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता . थोड्यावेळाने आईनेच त्याला हाक दिली , ‘ गरमागरम पोहे बनविले आहेत सुनबाईने . बाहेर ये . ‘ मनोहर बाहेर आला . माधुरीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली .

‘ काय दादा …. कुठं घेऊन जाणार आहेस वाहिनीला हनीमूनसाठी ? ‘ चुलत बहिणीनं त्याला विचारलं .‘ कुठं ही नाही . ‘‘ का रे … ? वाहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला ? ‘ ‘ बाहेर तर नेणार आहे … पण .. ‘ मनोहर आईकडे वळला ,’ उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे . ‘

‘ कां रे … ? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का ? ‘ आईने विचारले .‘ नाही … माधुरीचीच जायची इच्छा आहे . ‘ मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितले व म्हणाला , ‘ काल रात्री म्हणत होती , तिचं काही जरुरी काम आहे , तिला माहेरी जावं लागेल . ‘

आता सर्व जोरजोराने हसू लागले . मनोहरला गोंधळल्या सारखं झालं . त्याने माधुरीकडे बघितलं तर तीही हसत होती .त्याला कळेचना की सर्व कां हसत आहे ? तो रागाने म्हणाला , ‘ हसायला काय झालं ? ‘

‘ काल कोणती तारीख होती ? ‘ आईने विचारले .‘ एक एप्रिल . ‘ लगेच मनोहरच्या तोंडून निघाले .‘ दादा , तू ‘ एप्रिलफूल ‘ बनला . ‘ चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर धप्पा दिला .
‘ सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला . ‘ बाबा म्हणाले .

मनोहर आता आणखीनच चिडला , ‘ पण मग तो प्रियकर …. ? ‘‘ गोपाळकृष्ण सोबत आणले आहे सुनबाईने …. पूजेसाठी ठेवले आहे देव्हाऱ्यात . ‘ आई हसत म्हणाली

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: