आसामचे सीएम ठाकरेंना म्हणतायेत ‘तुम्ही पण इकडे या ‘
सध्या महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या या सत्तानाट्यात आसाम सरकार मात्र जोरात चर्चेत आहे. याचे कारण, महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार हे आसाम राज्यातील गुवाहटी
येथील एका हॉटेलात जाऊन थांबले आहेत. यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ‘आसाममध्ये हॉटेलात येण्यापासून मी कुणालानकसं रोखू शकतो. तुम्ही (उद्धव ठाकरे) पण इकडे या’ अशी टिपण्णी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केली आहे.
आसाममधील गुवाहटीत सध्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह हॉटेल ब्लू रेडिसन येथे थांबले आहेत. शिंदेंच्या आसाममध्ये जाण्याने तेथील भाजप सरकारला देखील अनेकदा लक्ष्य केले
जात आहे. आसाममधील भाजपा सरकार या बंडाला अप्रत्यक्ष साथ देत असल्याची टीका केली जात आहे.
याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘आसाममध्ये येणाऱ्या देशातील सर्व नेत्यांचे आणि नागरिकांचे स्वागत आहे. मी कुणालाही आसाममध्ये येण्यापासून रोखू शकत नाही.’ उद्धव ठाकरेंना तुम्हा काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर, ‘मी उद्धव ठाकरेंनाही सुट्टीसाठी इकडेच या असे सांगेल’ असे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले.