महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्षे पूर्ण झाले असले तरी अडीच वर्षानंतरही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे आरोप एकमेकांवर तिन्ही पक्ष कायम करताना दिसतात. तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सरकार मजबूतीने काम करत असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशातच नुकतंच आता मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले होते. यावरुन आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. ‘यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, महागाईपासून दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू दे’, असं साकडं त्यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी घातलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं देखील म्हटलं होतं.
यावर आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “२५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा प्रार्थना आहे. राज्याला जर महिला मुख्यमंत्री मिळावं असं असेल तर यासाठी रश्मी ठाकरे सुसज्ज आहेत. त्यांना राजकारणाचा देखील अभ्यास आहे. महाराष्ट्राच्या तमाम मंदिरांमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आधीच पूजा झालेली आहे. उद्धव ठाकरे हेच २५ वर्षे मुख्यमंत्री पदी राहतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही. २५ वर्षानंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे,”