राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेने आधी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. जर निवडणूक बिनविरोध करायची होती तर शिवसेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. तसेच, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते, मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या. भाजपकडून उमेदवारी हवी अशी त्यांची भूमिकाच नव्हती. ते अपक्ष उभे राहणार असेच म्हणत होते, असे रामदास आठवले म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, धनंजय महाडिक हे ताकदवर उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षे पूर्तीनिमित्त रामदास आठवले यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या. “मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पूर्ण आठ आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ, शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट!”, असे रामदास आठवले म्हणाले.