उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यातच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसानंतर जामीन मंजूर झाल्यापासून ते सतत शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. त्यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका केल्यापासून त्यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.
अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनीही चंद्रकांत खैर आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे. सत्ता गेल्यानंतर आता संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांना कुठलेही काम नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या लालसेपोटी काहीही विधाने ते करत असतात. सत्ता गेल्याने चंद्रकांत खैरे असोत की राऊत यांना बडबड करण्याव्यतिरिक्त कुठलेही काम उरलेले नाही. सध्याच्या राजकारणात चर्चेत राहण्यासाठी आणि माध्यमांमध्ये झळकण्यासाठी ते काहीही विधाने करत असतात, त्यामुळे ते दररोज सकाळी उठल्याबरोबर माध्यमांसमोर बोलत असतात, असा चिमटा त्यांनी काढाला.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. त्यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, आता उद्धव ठाकरे गटाचा पक्ष शेवटची घटका मोजत आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याच पक्षावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही.शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून खोके सरकार असल्याचा आरोप केला जात आहे. शिंदे गटावर पैसे घेतले असल्याचाही आरोप केला जात आहे.