रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – उद्धव ठाकरे

मुंबई | वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमारडीए मैदान, वांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणा-या वाहनांच्या अपघातात बळी जाणा-यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून यामाध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

कारण नसतांना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Team Global News Marathi: