राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आता आक्रमक होताना दिसत आहे. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी उद्या मुंबईत भाजपा कडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शेलार म्हणाले, नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईत उद्या भाजपचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाला अद्याप मुंबई पोलीसांकडून परवानगी नाही. मात्र परवानगी न दिल्यास परवानगी शिवाय मोर्चा काढणार असल्याचे शेलार म्हणाले.
तसेच मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, मोर्च्यासाठी आम्ही अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीसांची भेट ही झाली आहे. मात्र जो पत्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे.
मलिकांचा राजीनामा घेण्यात येत नाही. हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे., केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे.