राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेवार उतरवले असून या निवडणुकीवरून राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं तिसरा उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. सुरुवातीला संभाजीराजे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याची घोषणा केली होती. परंतु कुठल्याही पक्षाने संभाजीराजेंना थेट पाठिंबा न दिल्यानं अखेर या निवडणुकीतून माघार घेतली.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ४ उमेदवार दिले आहेत. मविआकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. तर भाजपानेही या निवडणुकीत ३ उमेदवार देऊन चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ उमेदवार निवडून येण्याइतपत मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यात अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.
आता या निवडणुकीत आणखी एक अपक्ष उमेदवार उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने जो कुणी आमदार त्यांना सहकार्य करेल त्यांना सफारी गाडी भेट देऊ असं आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे.
अरुण निटुरे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी आम्हाला सहकार्य करावं. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदाराने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सहकार्य करून मला संसदेत पाठवावं. त्या आमदारांचे उपकार विसरणार नाही. जे आमदार मदत करतील त्यांना पक्षाच्या वतीने सफारी गाडी भेट देऊ. यासाठी ४५ वाहनांचे कोटेशन आणलं आहे. त्याची किंमत जवळपास ११ कोटीपर्यंत जाते. कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे सहकार्य करू ही लालच नाही. गरीब शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवावं ही हात जोडून विनंती असल्याचं अरूण निटुरे यांनी सांगितले.