राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू गृहमंत्र्यांचा मोठा दावा

 

मुंबई | हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली आहे. राणा विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन राणा विरुद्ध सेना संघर्ष पेटला असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा केला.

सध्याच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योग्य पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

त्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे करण्यात आलेलं एक प्यादं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवून सरकार अस्थिर करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा पठण करावी यासाठी इतका आग्रह कशासाठी, असा सवाल दिलीप वळसे-पाटलांनी उपस्थित केला. राणा यांच्याकडून प्रसिद्धीसाठी स्टंट सुरू आहेत. त्यांना हनुमान चालिसा पठण करायची असल्यास त्यांच्या मुंबई, अमरावती, दिल्लीतील घरी करावी, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला.

Team Global News Marathi: