पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून नाइलाजाने राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यात पाऊण तास चर्चा झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याच भेटीवरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना चौहान म्हणाले, पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवले. सध्या राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही असा म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता.