कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना स्थानिक वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. अशातच आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील त्यांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षविरोधात खड्डयांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
आमदार राजू पाटील यांनी कल्याणमधील चक्की नाका ते नेवाळी रस्त्याची पाहणी केली. तेथील रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कल्याण-डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे तर खड्ड्यांची समस्या आणखीनच वाईट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्यांची अवस्था पाहून राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आता सहनशीलतेचा अंत झालाय, खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात ११४ कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. येत्या १५ दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरावं लागेल, असा इशाराही आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिला आहे.