गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. राज्यातील काही ठिकाणी आलेली पूरस्थिती, खड्डेमय रस्ते, महिला अत्याचार या मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांमध्ये राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून कधी बाहेर पडतील, अशी विचारणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणांहून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच कोकणाला तडाखा दिल्यानंतर पूर्व किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रावर पाहायला मिळाला. अतिवृष्टीमुळे येथील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही केली जात आहे. यातच मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
शालिनी ठाकरे यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, अशी विचारणा शालिनी ठाकरे यांनी केली आहे.
उद्यापासून 'घट' बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?#महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते #
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 6, 2021