राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना वेंटेलिटेर बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्या वरून आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या रंगल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केला मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. दरम्यान या नंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे आहे.
‘महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारला गेलेला जाब म्हणजे केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत असलेल्या महाविकास आघाडीला सणसणीत थप्पड आहे.आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?,’ अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी ट्विटमधून केली आहे. आता भातखळकर यांनी केलेल्या टीकेला आघाडीचे नेते काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केला गेला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का दिला गेला, या दिल्ली सरकारच्या प्रश्नावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला. मध्य प्रदेशने ४४५ मेट्रिक टन तर, महाराष्ट्राने १५०० मेट्रिक टन प्राणवायूची केंद्राकडे मागणी केली होती. या राज्यांना अनुक्रमे ५४० आणि १६१६ मेट्रिक टन प्राणवायू पुरवण्यात आला. दिल्ली सरकारने ७०० मे. टन प्राणवायूची मागणी केली असतानाही केंद्राने फक्त ४९० मे. टन प्राणवायू देण्याचा निर्णय घेतला. असे उच्च न्यायालयाने म्हंटले.