मुंबई | राज्य सरकारने मुंबईतील झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प SRA अंतर्गत आता मुंबई शहरात कुठेही फक्त अडीच लाखात घर उपलब्ध होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच मुंबैकरणाचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
“एसआरएबाबत आज महत्वाचा निर्णय झाला आहे. झोपडी निष्कासित झाली की 3 वर्षात विकता येईल. सशुक्ल घर विकत घ्यायचं असेल तर तो दर अडीच लाख रुपये ठरला आहे. गरिबांना अडीच लाख रुपयात घर घेता येणार आहे. या निर्णयावर विरोधकांना काय बोलायचे यावर मला बोलायचे नाही. लाखो झोपडपट्टी धारकांना याचा फायदा होईल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गातील सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झोपडी निष्कासित झाल्यानंतर लगेच विकता येणार नाही, असं स्पष्ट मत राज्य सरकारने मांडलं आहे. विकास कामांमध्ये गेलेली झोपडी निष्कासित झाल्यानंतर निदान तीन वर्ष विकता येणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.