मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर आमदार राजू पाटील उतरणार नवी मुंबई’च्या आंदोलनात |

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर आपली रोखठोक भूमिका मांडत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव उचित असल्याचे विधान केले होते.तसेच रस्त्यावर कोण उतरणार हे बघूया, असा इशाराही दिला होता. पण, मात्र आता नवी मुंबईत लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याची घोषणाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या जोरदार होऊ लागणी आहे. ३ दिवसांपूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी वस्तुस्थितीत मांडत नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे त्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहे, असं सांगितलं होत.

आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. आज नवी मुंबईतील सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलकांनी विराट मोर्च्याचे नियोजन केले आहे. या आंदोलनात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे सुद्धा सहभागी होणार आहे. या आंदोलनात आपण का सहभागी होते, याबद्दल राजू पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून खुलासा केला आहे.

काय लिहिले आहे फेसबुक पोस्टमध्ये वाचा

जय महाराष्ट्र,
मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.
राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे.
राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.
आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत.
त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.
म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.
आपला,
राजू पाटील.
Team Global News Marathi: