..म्हणून भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल चुकीचे उद्गार, मिटकरींनी सांगितलं खरं कारण

राज्यातील शेतकरी संकटात आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात फार रस नाही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांवर भाजप नेत्यांकडून वारंवार चुकीची वक्तव्य करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि इतर काही मंत्र्यांनी केलेली वक्तव्य याच मालिकेतील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. सोलापूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण महोत्सवात केलेल्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदेंना अजूनही माहिती नाही की आपण मुख्यमंत्री आहोत. समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळेस स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री पदावर होते, त्या त्या वेळी राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला. याबद्दल जनजागृती व्हावी म्हणूनराज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मिळाव्याचं आयोजन केल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस ‘गोवर’च संकट वाढत आहे. सध्याचा आरोग्यमंत्री कोण आहे हे मला माहिती नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी टीका केली. तर कोरोना काळातील राजेश टोपे यांच्या कामाशी त्यांनी तानाजी सावंत यांची तुलना केली. आरोग्यमंत्री तानाजी सवंतांना हाफकिन माहिती नाही, गोवरचा प्रादुर्भाव कसा टाळावा हे माहिती नाही, असे मिटकरी म्हणाले.

राज्यातील शेतकरी संकटात असताना त्या मुद्द्याला विचलित करण्यासाठी भाजपातील नेत्यांकडून शिवरायांवर जाणीवपूर्वक चुकीचे विधान केले जातात. राज्यपाल, मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, पडळकर, प्रसाद लाड ही लोक शिवाजी महाराजांच्या विषयाला हात घालून मुद्दे भरकटवत आहेत, असा आरोप मिटकरी यांनी केला

Team Global News Marathi: