मुंबई | भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये जे नव हिंदुत्ववादी ओवेसी आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याची, दंगली घडविण्याची, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरु आहेत.’ असे गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता मनसेवर केला आहे.
राऊत म्हणाले की, ‘निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या MIM चा वापर केला त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नव हिंदुत्ववादी जो ओवेसी आहे त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याची, दंगली घडविण्याची, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत.’
‘महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे. जागरुक आहे. संयमी आणि ज्ञानी आहे. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. पण तो यशस्वी होणार नाही.’ अशा स्वरुपाचे आरोप संजय राऊत यांनी केली आहे.