महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यावर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली असून औरंगाबाद आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून असे कितीही राज ठाकरे आले गेले तरी त्याचा इथं काहीही परिणाम होणार नाही, असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
दानवे म्हणाले, औरंगाबादमध्ये आम्ही राज ठाकरेंचं स्वागत करु. पण औरंगाबादच नव्हे तर मराठवाडा सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथं अनेक सभा गाजवून इतिहास निर्माण केला आहे. असा इतिहास कोणाकडूनही निर्माण होणं शक्य नाही. त्यामुळं राज ठाकरेंसारखेंच्या सभा होतील आणि जातील पण त्यामुळं औरंगाबादवर काहीही परिणाम होणार नाही.
राहिला प्रश्न अयोध्येचा उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच आधी मंदिर आणि नंतरच सरकार अशी घोषणा केली होती. नंतर सुप्रीम कोर्ट आणि सगळे जागे झाले, पुढं सर्व जागाला माहितीए की सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. आदित्य ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी अयोध्येत जाण्याची घोषणा केली. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा अनेक लोकांनी हात वर केले होते त्यात भाजपही होता. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान असेल. आजही अयोध्येतल्या गल्ली गल्लीत याची चर्चा होते, असंही दानवे यावेळी म्हणाले.