स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने समर्थ बूथ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी समर्पित करण्यात येणार आहे.
पाच बूथमागे एक शक्ती केंद्र प्रमुख नेमण्यात येत आहेत. स्थानिक सामाजिक समीकरणानुसार नावे निश्चित केली जातात. प्रत्येक बूथवर भाजपचे प्रमुख पदाधिकारी बैठक घेतात आणि तेथे मतदार यादीचे वाचन केले जाते. त्याची माहिती प्रदेश भाजप कार्यालयास पाठवावी लागते.
प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयात या संपूर्ण अभियानासाठी वॉर रूम असून तेथे ३५ जणांची टीम काम करीत आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी दिली. ‘आमच्या गाडीला यापुढे एकच इंजिन राहील’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध मनसेला सोबत घेण्याशी जोडला गेला.
मात्र प्रत्यक्षात भाजपने पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची मदत मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे महापालिकेत घेतली जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.