मुंबई | १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . माननीय विरोधीपक्षनेते फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आज संसदेत १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. त्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला. आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहेच. त्याबाबत काय करायचं हे राज्य ठरवेल. त्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो. काही वकिली सल्ला लागला तर सरकार नक्कीच त्यांचा सल्ला घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असं राऊत म्हणाले.
राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिला तरी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याने वाढवता येणार नाही. त्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही याची शंका आहे. तरीही केंद्र सरकारने जे पाऊल टाकलं त्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यावर लोकसभेत चर्चा होईल. उद्या राज्यसभेत येईल. आम्ही पूर्णपणे या जनतेच्या हिताच्या बिलाला पाठिंबा देत आहोत