राज्यात आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्ष उलटले तरी या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते अशातच आता माजी आमदार नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली असतानाच आता काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. राजकारण बंद करा, लोकांच्या हिताचे निर्णय घ्या, लोकांसाठी काहीतरी करा. निवडणूक आल्यानंतर लोकांना भाड्याचे पैसे, किल्ल्या देऊन आश्वासने देऊ नका, असा टोला सिद्दिकी यांनी टि्वटरच्या माध्यमातून लगावला आहे.
सिद्दिकी यांनी मंगळवारी टि्वटरवरून एक व्हिडीओ प्रसारित करून अनिल परब यांच्याविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्या हस्ते वांद्रे येथील गोळीबार एसआरए योजनेतील काही जणांना किल्ल्या वाटप करण्यात आले. यावरून सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक जण शिवालिक बिल्डरवर नाराज आहेत. हक्काचे घर मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे ते धडपड करीत आहेत. विधानसभेतही हा प्रश्न विचारण्यात आला. दुदैवाने आजपर्यंत उत्तर मिळाले नाही. शिवालिक बिल्डरवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न सिद्दिकी यांनी उपस्थित केला.
परब हे स्वहस्ते २० ते २५ जणांना किल्ल्या वाटत आहेत. मग ज्यांना अद्याप घरे मिळाली नाहीत त्या हजारो लोकांचे काय, विकासकाला किल्ल्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही, असा आरोपही त्यांनी केला. मंत्र्यांनी स्वत:चे कार्यालय, घर तपासावे. कदाचित इतर हजारो जणांच्या घराच्या किल्ल्या तुमच्याकडेच सापडतील असा टोला सुद्धा लगावला.