राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासू भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या डजनभर मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल ४० CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल.
किरीट सोमय्यांना Z दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली असून किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल.
तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात. सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारमधील ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.