राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.
आमदार अँड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी आज त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज नंदुरबार मधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एक अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशन साठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे, जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजून मंत्रालयातच नाही पोहोचले ते नंदुरबार सारख्या अती दुर्गम भागात कधी व कसे पोहचणार? राज्याच सरकार नाही पण नंदुरबार पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र पोहचलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना सुरु असलेला हा जिल्हा आहे.
नंदुरबार मध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. 20 जुलै पर्यंत 3 लाख 5 हजार हेक्टर पैकी 1 लाख हेक्टर पर्यंत पेरणी झाली तर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पिक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. 20 हजार पेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल ही त्यांनी केला.
शेतीच्या, पाण्याच्या अडचणीमधे असताना ठाकरे सरकार नंदुबारमधे नाहीच पण पालकमंत्री मात्र गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरु असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. याबाबत भाजप आक्रमक पावले उचलेल असे ही ते म्हणाले.