राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मालमत्ता व्यवहारात अनियमितता आढळल्याच्या आरोपांवरून सक्तवसूली संचनालयानं अटक केली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात मोठा संघर्ष उद्भवला आहे. भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.
नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दाऊदचे अनेक व्यवहार मलिकांच्या संमतीनं झाल्याचं ईडीनं स्पष्ट केलं आहे. ईडीकडून मलिकांना फसवण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. परिणामी हा वाद वाढत चालला आहे. अशातच मलिकांच्या जामीनाच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली.
ईडीकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा मलिक यांचे वकील अॅड अमित देसाई यांनी केला आहे. तर अटक कायदेशीर असल्याचं ईडीचे वकिल म्हणाले आहेत. ईडीच्या कारावाईला बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परिणामी आता मंगळवारी न्यायालय निकाल देणार आहे. विशेष न्यायालयानं मलिकांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.