राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या त्याचे श्रेय आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे श्रेय आहे. आता जीवाची बाजी लावू पण बैलगाडा शर्यत कदापि बंद करू देणार नाही, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत आमदार महेश लांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीचे बक्षीस वितरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्रीक्षेत्र नारायणपूरचे प. पू. अण्णा माऊली महाराज, आमदार राहुल कुल, प्रसाद लाड, समाधान अवताडे, नितेश राणे, सुनील शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी आमदार लांडगे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. फडणवीस यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर आम्ही बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. पण, फडणवीस यांनी कधी श्रेय घेतले नाही. फडणवीस यांना श्रेय मिळू नये, यासाठी राजकारण केले गेले’.