मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर भाजपच्या नाईक पक्षांनी टीका केली आहे. अख्तर यांच्याशी संबंधित चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिल्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी अख्तर यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.
नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे. ‘अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. ते तालिबानी राजदूत असल्यासारखे वागत आहेत. हिंदुत्ववाद्यांशी तुलना करून अख्तर यांना तालिबानचं उदात्तीकरण करायचं आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय कळायला मार्ग नाही,’ असं नीतेश यांनी पत्रात म्हटलं आहे.
हिंदुत्वानं नेहमीच सर्वसमावेशकतेला स्थान दिलं आहे. त्यामुळंच भारतात वेगवेगळ्या संस्कृती बहरल्या. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. भारतात राहणारा या भूमीवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असं संघ मानतो, असं नीतेश यांनी म्हटलं आहे. अख्तर यांच्या हिंदुत्वाबद्दलच्या अभ्यासाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. हस्तीदंती मनोऱ्यात राहून अख्तर हे देशाकडं पाहतात. तसं नसतं तर संघ करत असलेली सामाजिक व शैक्षणिक कामे त्यांना दिसली असती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.