मुंबई | भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेचा राज्यभर सुरु असलेल्या यात्रेचा रथ रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहेत. या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी काँग्रेस पोलखोल करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे पितळ उघडे करणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबतची माहिती दिली. केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असतानाही जनआशिर्वाद यात्रा काढत आहे. या जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती महेश तपासे यांनी दिली.
वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना संसारहाला रोखण्यात आलेले अपयश, फोन टँपिंग माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा ऊहापोह या पत्रकार परिषदेत केला जाणार आहे. शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहे हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.