सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा विधान करून पक्षाच्या आणि स्वतःच्या अडचणी वाढण्याचे काम केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना अद्दल घडवण्याची गरज असल्याचे म्हणाले.
तसेच गावांत असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मी स्वतः १० हजार जणांची फौज उभी करतो. शस्त्रही पुरवतो, त्यांना आपण वठणीवर आणू, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे. आता त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आणि पक्षावर जोरदार टीका होताना दिसत आहे,
खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापुर येथे काही समाजकंटकांनी गावातील घर व वाहनांची जाळपोळ व तोड़फोड़ केली होती. त्यामुळे पीड़ित वाघ कुटुंबिय दहशतीमुळे गावाबाहेर निघुन गेले होते त्यांची तेथे जाऊन भेट घेतली व परिस्थितिची पाहणी केली. ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात मोठी दहशत माजवली आहे. संजय गायकवाड यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. तसंच बोलण्याच्या नादात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
दरम्यान, ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात. अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येनं असल्यानं आणि संघटित नसल्यानं इथं वारंवार हल्ले होतात, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.