कोल्हापूर | राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चार तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली. सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता ते माझ्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठं करू असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.
तसेच पंतप्रधानपदाबाबत जानकर म्हणाले, “आमच्या पक्षाचं ध्येय हे दिल्ली आहे. टार्गेट दिल्ली ठेवून आमच्या पक्षाची वाटचाल सुरु आहे. मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन. पण मी पंतप्रधान होणारच” असे विधान जाणकार यांनी केले आहे. आता या विधानावर महाराष्ट्रातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.