मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच सत्तेत असलेल्या शिवसेना आणि विरोधात बसलेले भाजपमध्ये वाद सुद्धा उफाळून येताना दिसून येत आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकांवरूनही शिवसेना-भाजप आमनेसामने आल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ठरवले असते तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमीनीपासून आकाशापर्यंत नेले. ठरवले असते, तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे राऊत म्हणाले की, आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे. ही एकट्या शिवसेनेची गोष्ट नाही. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागली. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असे काम केले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.