मुंबई | राज्यात थकीत वीजबिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला असून वीजबिलाची वसुली होत नसल्याने महावितरणचा तोटा वाढत चालला आहे.. नागरिकांनी वीजबिल भरावे, यासाठी ठाकरे सरकारकडून सातत्याने विविध सवलती दिल्या जातात. मात्र सवलती देऊन सुद्धा वीजबिलाची वसुली होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
थकीत वीज बिलाचा जटील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. थकीत वीज बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच मोठी घोषणा केलीय. त्यामुळे राज्यातील वीजबिलाची वसूली तर होईलच, शिवाय ग्राहकांचाही मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते..
मंत्री राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की वीज ग्राहकांनी एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘विलासराव देशमुख अभय योजना’ असे या याेजनेचे नाव असल्याचे मंत्री राऊत यांनी जाहीर केले.