शेतकर्‍यांच्या मागण्या ठाकरे सरकारला मान्य करायला लावू – देवेंद्र फडणवीस

 

राज्यात अर्थसंकल्पीय अधिववेशनाला सुरवात झाली असून विविध मुद्दयावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांनी वेठीस धरले आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीवर घणाघाती निशाणा साधला आहे.शेतकर्‍यांची वीज बिले माफ करावी, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करून एकरकमी एफआरपी द्यावी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, आदी मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला.

भाजपा प्रदेश किसान मोर्चाने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाला फडणवीस संबोधित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारने शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडली जाणार नाही, अशी घोषणा विधिमंडळात केली होती. मात्र, या घोषणेला हरताळ फासत शेतकर्‍यांकडून पठाणी पद्धतीने वीज बिल वसुली केली जात आहे. आमचे सरकार सत्तेत असताना वीज बिल थकले तरी, शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले नव्हते. लाखो रुपयांची बिले थकविणार्‍या धनदांडग्यांचे कनेक्शन कापण्याची हिंमत न दाखविणार्‍या सरकारने गोरगरीब शेतकर्‍यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लावला आहे.

Team Global News Marathi: