केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असून आता या आंदोलनाला उत्तरप्रदेशात हिंसक वळण लागले आहे. उत्तरप्रदेशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घातली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूरमध्ये ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती.
शेतकरी आंदोलनावेळी वाहन शिरल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात वातावरण तापलं आहे. भाजप सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट भाजपच्या वर्मी घाव घातला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजप आणि मोदींची पॉलिसी आहे का?, हे त्यांनी स्पष्ट करावं, अशा संतप्त भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर घटनेने देशात लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न पडतो. इथले शेतकरी काय देशविरोधी कृत्य करत आहेत काय? त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याची परवानगी नाही काय?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित करताना शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नका आणि जर घ्याल तर देशभरात काय होईल ते पाहा, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला.
शेतकऱ्यांविरोधात सरकारच्या मनामध्ये इतका द्वेष का?, ते कोणतं देशविघातक कृत्य करत आहेत. शेतकरी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत. देशाच्या लोकशाहीचं आपण जगभरात उदाहरण देतो. अशावेळी आपल्याच देशात काय चाललंय? उत्तर प्रदेशात आंदोलनांना चिरडण्याची नवा प्रथा सुरु झाली आहे. बरं विरोधकांना तिथे जाण्यापासून भाजप का रोखत आहे. अनेक नेत्यांना पीडित कुटुंबांशी बोलायचंय, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रियांका गांधींना रोखलं, दोन मुख्यमंत्र्यांना युपीत पाऊल ठेवण्यास बंदी घालण्यात आलीय, शेतकऱ्यांना चिरडण्याची भाजपने अधिकृत पॉलिसी स्वीकारली आहे का?, असा संतप्त सवाल राऊतांनी विचारला.