मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या ११० दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहे. केंद्राने पारित केलेले काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर या हाकेच्या काँग्रेसने पाठिंबा देत भारत बंदमध्ये सहभागी होणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत उपोषण करणार आहेत. तशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र अद्याप हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.