नाही येथील खरशेत शेंद्रेपाडा या आदिवासी वस्तीवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ओंडक्यांवरुन चालत जावं लागायचं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश देत याची तात्काळ दखल घेत या भागात लोखंडी पूल बांधून देण्याचे आदेश दिले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या आदिवासी पाड्यातील प्रश्नांची दखल घेत समस्या भेडसावत असलेल्या १३ ही पाड्यांपर्यंत पाणी पोहचवलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. आज नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी या आदिवासी पाड्याला भेट देऊन लोखंडी पुलाची पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांशी संवाद साधून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
काही आठवड्यांपूर्वी, शेंद्रीपाडा येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे वृत्त पाहिले. त्याची दखल घेऊन २ दिवसात, आम्ही त्यांच्यासाठी मजबूत पूल बांधला. आता जल जीवन अभियानांतर्गत ३ महिन्यांत येथील सर्व १३ पाड्यांना नळांद्वारे पाणी देण्याचे ध्येय आहे. pic.twitter.com/ExjN7nsyqy
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 28, 2022
यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील दुर्गम भागात असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा खरंतर आधीच पोहचायला हव्या होत्या असं म्हणत त्यांनी आदिवासी बांधवांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. येत्या ३ महिन्यांमध्ये १३ पाड्यांना पाणी पोहचवलं जाईल असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी आदिवासी नागरिकांना दिले.