नद्यांना मोठा पूर येण्यामागे आणि त्यातील होणाऱ्या नुकासानाला वाळू उपसा कारणीभूत ठरला आहे. तसेच, या वाळू माफियांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळू उपसा हा देवेंद्र फडणवीसांच्या काळातच जास्त वाढला असा पलटवार केला आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
आज जी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रातून वाळू काढण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे नदीपात्रात पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गेली ५, ६ वर्ष झालेला परिणाम असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
पाटील यांनी नांदगावला आल्यानंतर पुराने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. जयंत पाटील पहिल्यांदाच नांदगाव मतदारसंघात आले होते. त्यामुळे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भुजबळ-कांदे वाद अजूनही सुरू असताना आमदार कांदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे होर्डिंग लावून शिवसेना कार्यकर्त्यानी त्यांचे जोरदार स्वागत केल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.