राज्यात दिवसेंदिवस आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता अमरवतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी या ग्रामसेवकाने एक हृदयस्पर्शी चिट्ठी लिहिली होती. सदर चिट्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमरावती जिल्ह्यतील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत चेतन राठोड या ग्रामसेवकाने आत्महत्या केली. बडनेरा लगतच्या दुर्गापूर येथिल हनुमान मंदिर जवळ गळफास घेत त्यांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्यांनी हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहून ती व्हॉट्सअपला व्हायरल केली. ऑडिटमध्ये डॉक्युमेंट्स दाखवण्यात आले नसल्याने माझ्यावर 29 लक्ष रुपयांची रिकव्हरी काढली. तसेच घरकुलाचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. मात्र, घरकुलाच्या घोटाळ्यामध्ये माझ्यावर रिकव्हरी काढून मला सेवेतून कमी करण्यात आले.
मात्र, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणीही मार्गदर्शन केले नाही व मला नोकरीतून कमी केले, असा आरोप त्यांनी केला आहे. तर राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष वणवे यांच्याकडे केली. मी आता नवीन घर बांधले आहे, त्याचे लोन आहे. मात्र, आता माझ संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामसेवकांनी माझ्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत करावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी चिठ्ठीमध्ये केले.