मुंबई | मुंबईमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जीर्ण व धोकादायक इमारतींमधील रहिवास्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा यापूर्वीच मुंबई महानगर पालिकेने दिला होता. मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजप भौ भौ काय करायचे, ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असे ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी विरोधकांना काढला होता . मालाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तसेच महापौर किशोरी पेडणेकरांनीही भाजप नेत्यांवर खोचक टीका केली. त्यांच्या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
आता महापौर पेडणेकर यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ‘मा. महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो.’ अशा शब्दात भातखळकर त्यांच्यावर पलटवार केला आहे.